महाभारताचे युद्ध भारतीय इतिहासातील एक महासंहारक व जीवनविषयक अनेक पाठ शिकवणारे युद्ध मानले जाते.महाभारताच्या युद्धामध्ये कौरव आणि पांडवांचे मध्ये सत्तेच्या हव्यासापोटी युद्ध लढले गेले व यामध्ये सत्याची बाजू म्हणून भगवान श्रीकृष्णाने पांडवांची साथ दिली व परमपराक्रमी अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले.या संपूर्ण युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाचे सार सांगितले.
भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाला आज सुद्धा जीवनाची दिशा म्हणून पाहिले जाते.नातेसंबंधांवर एक प्रकारे टिप्पणी करणारा हा संवाद आहे.महाभारतातील अनेक घटना या उल्लेखनीय मानल्या जातात.त्यांपैकीच एक घटना म्हणजे ज्यावेळी महाभारताचे युद्ध संपले त्यावेळी रथातून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्वप्रथम उतरण्यास सांगितले.यामागचे कारण काय होते हा प्रश्न नक्कीच पडला असेल.आज आपण हे जाणून घेणार आहोत.
कौरव वंशाचा नाश झाला,सर्वत्र कौरवांचे व कौरव सैन्याचे मृतदेह रणभूमीवर पडले होते हा महाभारताच्या युद्धाचा शेवट होता व युद्धाचा शेवट झाल्या नंतर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना रथा मधून सर्वप्रथम उतरण्याचा आग्रह केला होता मात्र त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्वप्रथम रथाच्या बाहेर उतरण्यास सांगितले.अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांच्या कृतीचे आकलन झाले नाही मात्र त्याने भगवान श्रीकृष्णांचा आदेश मानला व तो खाली उतरला.
अर्जुन रथा मधून खाली उतरल्यानंतर या रथाच्या वर पताका घेऊन बसलेले भगवान हनुमान रथाच्या खाली येऊन अदृष्य झाले व त्यानंतर भगवान श्रीकृष्ण रथा मधून खाली उतरले.भगवान श्रीकृष्ण रथा मधून खाली उतरल्याबरोबर हा रथ जळून क्षणार्धात खाक झाला.आपला रथ असा जळून एका क्षणात कसा नष्ट झाला हे अर्जुनाला समजले नाही व त्याला धक्का बसला.त्यावर भगवान श्रीकृष्णाने सांगितले की हे अर्जुना कर्णाने तुझ्या वर बाणांचा वर्षाव करण्या अगोदरच रथ नष्ट झाला होता मात्र साक्षात भगवान हनुमान या रथावर पताका घेऊन बसले होते व माझ्या सामर्थ्याने मी हा रथ चालता ठेवला होता.
त्यामुळे जेव्हा हे युद्ध संपले त्यावेळी मी आणि भगवान हनुमान ज्या क्षणी रथातून खाली उतरलो त्याक्षणी रथ भस्मसात झाला. त्या क्षणी श्रीकृष्णांनी ही कृती करणे यामागे नक्की कारण काय होते तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचा अहंकार दूर करण्यासाठी ही कृती केली होती.कर्णाचा नाश केल्यानंतर अर्जुनाला अहंकार झाला होता मात्र ही सर्व किमया साक्षात परमेश्वराची होती हे जाणवल्यानंतर त्याचा अहंभाव दूर झाला.