शाहरुख खान हा गेल्या दोन दशकभरातील बॉलीवूड मधील सुपरस्टार मानला जातो.शाहरुख खानला अनेक वेगवेगळ्या उपाध्या त्याच्या चाहत्यांकडून दिल्या जातात.शाहरुखला मिळालेले यश व प्रसिद्धी यामुळे त्याला बॉलीवूडचा किंग खान असेसुद्धा म्हटले जाते.शाहरुख खानने खूप संघर्ष करत आज हे स्थान मिळवले आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून तो आपला मुलगा आर्यन याच्या कथित ड्र’ग्स प्रकरणांमध्ये अटकेनंतर प्रसारमाध्यमांच्या नकारात्मक चर्चेचा विषय ठरला आहे.शाहरुख खान च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ही अनेक गोष्टी या निमित्ताने समोर आल्या आहेत.शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेत्यांपैकी एक असून तो तितक्याच मोठ्या प्रमाणात दान धर्म सुद्धा करतो.शाहरुख खान विविध माध्यमांमधून गरजूंना मदत करत असतो .शाहरुखच्या या दानधर्म विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
शाहरुखने आपल्या वडिलांच्या नावाने एक समाजसेवी संघटना स्थापन केली आहे.या संघटनेचे नाव आहे मीर फाउंडेशन.मीर फाउंडेशन हे नाव शाहरुखने आपले दिवंगत पित्याच्या नावावरून ठेवले आहे.या सामाजिक संस्थेमार्फत अनेक समाजोपयोगी कार्य राबवली जातात.यांपैकी महत्त्वाचे म्हणजे ही संस्था समाजातील दुर्बल पीडित व अबला अशा स्त्रियांची मदत करते.या ठिकाणी या महिलांना राहण्यासाठी जागा दिली जाते,त्यांच्या पालनपोषणाची सोय केली जाते व या स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण सुध्दा दिले जाते.ज्या मुली विवाह योग्य आहेत त्यांच्या विवाह साठी सुद्धा प्रयत्न केले जातात.
या सर्व कामांसाठी शाहरुख खान करोडो रुपये खर्च करतो.या संस्थेमध्ये ज्या मुली किंवा महिलांवर ॲसिड हल्ला केला गेला आहे अशा महिलांवर ही उपचार केले जातात.त्यांच्या उपचारांचा खर्च उचलला जातो व त्यांना आश्रय ही दिला जातो.मीर फाउंडेशन ही संस्था संपूर्ण देशभरामध्ये चालवली जाते.या संस्थेमार्फत दररोज हजारो लोकांना जेवण पुरवले जाते.कोरोना संकटाच्या काळात भारतभर मीर फाऊंडेशनने गरजूंना अन्न पुरवले व त्याच प्रमाणे आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 80000 आरोग्य किट सुदधा या संस्थेने दिले होते.
सन 2020 साली शाहरुख खान च्या मीर फाउंडेशन ने पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना 50000 पीपीई किट सुद्धा पुरवले होते व यासाठी महाराष्ट्र शासनाने शाहरुखचे ट्विटरद्वारे आभारही मानले होते.शाहरुख खान आणि गौरी खान यांनी त्यांचे मुंबईतील चार मजली कार्यालय बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ला क्वारंटाईन असणाऱ्यांच्या सेवेसाठी देण्याची तयारी सुद्धा दाखवली होती.कोरोनाच्या काळामध्ये शाहरुख खान ने एक साथ या सामाजिक संस्थेसोबत मिळून खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान केले होते.
शाहरुख खान ने केलेल्या या सर्व दानधर्म व समाजोपयोगी कार्याची दखल घेत लंडन येथील एका महाविद्यालयाने त्याला डॉक्टरेट देऊ केली होती.त्यावेळी त्याने आपण करत असलेल्या दानधर्म बद्दल कधीही जाहीर वाच्यता करू नये असे म्हटले होते. आपण केलेल्या दान धर्माबद्दल उघडपणे बोलल्यानंतर यामागचे उद्दिष्ट सफल होत नाही. आपण केलेले दान धर्म हे नेहमी गुपितच ठेवले पाहिजे असे शाहरुखचे मत आहे. महिला सक्षमीकरण ,मानवी हक्क इत्यादींबद्दल आपली संस्था करत असलेल्या कामाबद्दल शाहरूख असे म्हणतो की ज्या समाजाने आज त्याला इतका सारा पैसा व प्रसिद्धी दिली आहे त्यांच्या ऋणांची उतराई होण्यासाठी आपण हे काम हाती घेतले आहे व माझ्या समाजातील स्थानाचा जास्तीत जास्त उपयोग मी यासाठी करू इच्छितो.