दरवर्षी कार्तिक मासामध्ये येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या तिथी वर भगवान विष्णुंचे शालिग्राम रूप आणि तुळस यांचा विवाह केला जातो.या एकादशीला देवोत्थान एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हटले जाते. देवोत्थान एकादशीचे महत्त्व म्हणजे धार्मिक साहित्य नुसार या दिवशी विष्णू आपल्या योगनिद्रा मधून जागृत होतात.या तिथी नंतर शुभ आणि मंगल कार्यांना सुरुवात केली जाते.२०२१ साली १५ नोव्हेंबर ला ही तिथी आलेली आहे.
तुळसी विवाहाला हिंदू धर्म संस्कृती मध्ये अनन्य साधारण महत्व आहे.असे मानले जाते की या दिवशी ज्या व्यक्ती भगवान विष्णूंना शालिग्राम रूपामध्ये पूजन करतात व तुळशीची पाने अर्पण करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात.तुळशी विवाह केलेल्या व्यक्तींवर भगवान विष्णूंची विशेष कृपा राहते.
वैवाहिक आयुष्यातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सुद्धा तुळशी विवाह करणे उत्तम उपाय मानले जाते.काही कारणांनी विवाह जमण्यास अडचणी येत असतील किंवा काही कारणामुळे विवाहामध्ये अडथळा येत असेल तर तुळशी विवाह करण्यास सुचवले जाते.
तुळशी विवाह कसा करावा याचे काही नियम आहेत.
१) तुळशी विवाह करण्यापूर्वी शुचिर्भूत होणे खूप आवश्यक असते.
२) ज्या व्यक्तींना तुळशीविवाह मध्ये कन्यादान करायचे आहे त्यांनी या दिवशी उपवास करावा.
३) तुळशी पूजा करताना अंगणामध्ये तुळशीचे रोप स्थापन करावे.छतावर किंवा देव्हा-यात तुळशी विवाह केला तरी चालतो.
४) शालिग्राम ची स्थापना करावी व शालिग्रामच्या उजव्या बाजूला तुळशीच्या रोपाची स्थापना करावी. तुळशीच्या पुढे रांगोळी काढावी.
५) तुळशी व शालिग्रामच्या वर उसाच्या वाढ्यांनी मंडपाची स्थापना करावी.त्यावर लाल वस्त्र टाकावे.
६) या पुजेमध्ये फळे आणि फुलांनाही समाविष्ट करावे.शालिग्रामला चंदनाचे गंध तर तुळशीला लाल गंध लावावे.तुळशीला एखाद्या नववधूप्रमाणे सजवावे.तुळशीच्या रोपामध्ये बांगड्या व अन्य सौभाग्यलेणे अर्पण करावीत.
७) घरातील पुरुषांनी शालिग्राम ला घेऊन सात वेळा प्रदक्षिणा करावी व त्यानंतर मंगलाष्टके म्हणून विवाह विधी संपन्न करावा.तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतर गोडाचा नैवेद्य अर्पण करावा.